Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला; २८ मे ते १ जून २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28,29 व 30 मे रोजी मराठवाडयातील सर्व जिल्हयत तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे. तसेच दिनांक 31 मे रोजी औरंगाबाद, बीड, लातुर, उस्मानाबाद तर दिनांक 01 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात  तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02 जून ते 08 जून, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी राहण्याची,  किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन  पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन जमिन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 गाडया शेणखत किंवा कंपोस्टखत (5 टन) जमिनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी.खरीप ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 3 ते 4 वखराच्या पाळया देऊन जमिनीची मशागत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 10 ते 15 गाडया चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करावी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीपूर्वी हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे. दूसऱ्या नांगरणीपूर्वी अडसाली लागवडीसाठी प्रति हेक्टरी 30 टन (50-60 बैलगाडया) शेणखत जमिनीत ‍मिसळावे.हळद लागवडीसाठी जमिनीची ट्रॅक्टरने 18 ते 22 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून नष्ट करावेत. नांगरीनंतर कुळवणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत आणि चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.

 फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे. संत्रा/मोसंबी बागेत मृगबहारासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात खत व्यवस्थापन करावे. मोसंबीसाठी 400:400:40‍0 व संत्र्यासाठी 500:500:500 ग्राम प्रति झाड नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले शेणखत + 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते 20 सेंमी खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी. डाळिंब बागेत मृगबहारासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात 300:250:250  ग्राम प्रति झाड  नत्र : स्फुरद : पालाश खत मात्रा द्यावी.चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे. चिकू बागेत खत व्यवस्थापन करावे.

भाजीपाला पिके

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन खोलवर नांगरून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत.  काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.

फुलशेती व्‍यवस्‍थापन

खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

बदलत्या ‍ हवामानात पिक पध्दतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पिक बदल करणे जसे गरजेचे आहे तसेच लहान व मध्यम भूधारक शेतकऱ्यांना कृषि आधारित पिक पध्दती स्विकारणे आवश्यक आहे. त्यात कुकुटपालन, शेळीपालन, रेशीम उद्योग, मधुमक्क्षीका पालन, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, मशरुम उत्पादन इत्यादी. तरच लहान शेतकरी शाश्वत उत्पादन घेणे शक्य होईल. खेडयात रोजगार निर्मितीची प्रचंड क्षमता रेशीम उगात असून बारा लोकांना प्रति वर्ष रोजगार उपलब्ध होतो.

चारा पिके

चारा पिकाच्या लागवडीसाठी एक नांगरट करून दोन ते तिन वेळा वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 20 ते 25 टन कंपोस्ट खत मिसळावे.

पशुधन व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून (ताशी 30-40 किलोमिटर) तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

सामुदायिक विज्ञान

स्वयंपाकघरात खोलीचे तापमान जास्त असते त्यामुळे या खोलीच्या  भिंतींना थंड रंग द्यावेत उदा. निळा, हिरवा.

  (सौजन्‍य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी )

Exit mobile version