Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कृषी हवामान सल्ला : १५ ते १९ डिसेंबर २१

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 2 दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. त्यानंतर किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पूढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहील.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 19 डिसेंबर ते 25 डिसेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान मध्यमप्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा लागवड केलेल्या कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी.

उशीरा पेरणी केलेल्या तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्राम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली  किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फल्यूबँडामाइड 20% 5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकावर शेंगा माशी चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली  किंवा ल्यूफेन्युरॉन 5.4% 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मेटालॅक्झील 4% + मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी  25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावार फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावर खोड किडा व लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम 12.6 % +‍ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी सूर्यफूल पिकात पानांवरील काळे ठिपके (अल्टरनेरीया) आढळून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत झाडांना काठीने आधार द्यावा, बागेतील वाळलेली व रोगट पाने काढून नष्ट करावीत.  बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत डाउनी मिल्डयूच्या व्यवस्थापनासाठी आमिसूलब्रोन 17.7% एससी 0.38 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ग्राम प्रति लिटर किंवा मॅडीप्रोपॅमीड 23.4% एससी 0.8 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

कोबी वर्गीय भाजीपाला पिकात पानावरील बूर्शीजन्य ठिपके रोगाच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 1.0 ते 1.5 ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. कोंबडयाच्या शेडमध्ये आवश्यकतेनूसार ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत.

सामुदायिक विज्ञान

सकाळचा नाश्ता एक महत्वाचे जेवण आहे कारण रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळच्या नाशत्यामूळे शरीराला लागणाऱी उर्जा तसेच आवश्यक पौष्टीक मुल्य चांगल्या आरोग्याकरिता आवश्यक आहे.

सौजन्‍य – डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Exit mobile version