एका कृषी सेवा केंद्राची ‘अमर’ कहाणी

कर्जासाठी बँकांच्या दारात चकरा मारून झाल्यावर नगर जिल्ह्यातील कुंभेफळ येथील अमर नलावडे यांना जेव्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती मिळाली, तेव्हा त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. जाणून घेऊ त्यांची छोटीशी यशकथा.

नगर जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या गावापासून साधारण ५ किलोमीटर अंतरावर कुंभेफळ हे सुमारे ७०० टे ८०० लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. अमर नलावडे हे याच गावचे रहिवासी.  ते कृषी पदवीधर आहेत. बी एस्सी अॅग्री केल्यानंतर त्यांनी पुण्याहून कृषी व्यवस्थापनाचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्यानंतर नोकरी करण्याचे ठरविले, पण बराच काळ त्यांना नोकरी मिळाली नाही.

तेव्हा नोकरीच्या पाठीमागे न लागता पुन्हा गावाकडे परतून शेती करण्याचे ठरविले. मात्र शेतीत हवे तसे उत्पन्न येत नव्हते, त्यामुळे शेतीशी संबंधित काही उद्योग करावा असे त्यांनी ठरविले.

त्यांच्या गावात कृषी सेवा केंद्र नव्हते. त्यामुळे हाच व्यवसाय त्यांनी निवडला. शेतकऱ्यांना खते, औषधे, बियाणे यांच्यासोबत कृषी सल्ला देण्याची मोलाची जबाबदारी अशी केंद्र करताना दिसतात. हा व्यवसाय नक्की झाल्यावर त्यांनी त्यासाठी लागणारे भांडवल उभारायचे ठरविले. त्यासाठी विविध बँकांकडे खेट्या मारल्या, पण तारण ठेवण्यासाठी काही नसल्याने त्यांचा प्रस्ताव मंजूर होत नव्हता.

ते सांगतात कि कर्ज मिळविण्यासाठी मी जे काही उपद्व्याप केले त्यातून पदरी निराशाच पडली. पण त्याचवेळेस महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून संधीचे दार खुले केले.

त्यामुळे पुन्हा माझ्या इच्छेला बळ मिळाले. मी नव्या उमेदीने कर्जप्रकरण करण्याचे ठरविले. महामंडळाच्या पोर्टलवर नोंदणी केली. प्रकल्प अहवाल आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यावर अवघ्या काही दिवसातच मला कर्ज मंजुरी मिळाली. कर्जत येथील ओरिएन्टल बँकेच्या माध्यमातून मला ५ लाखांचे कर्ज मिळाले. तिथूनच आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.

आज नलावडे यांचे स्वतःचे कृषी सेवा केंद्र, कर्जतला आहे. दर महिन्याचा हप्ता ते नियमित फेडत आले आहेत. महामंडळाच्या व्याज परताव्याच्या योजनेनुसार त्यांना आतापर्यंत व्याज परतावाही मिळाला आहे.

ते सांगतात कि सुरवातीला १४ हजारांच्या आसपास हप्ता होता. पहिले तीन महिने मी नियमित हप्ते भरले. त्यानंतर मला व्याज परतावा मिळाला. आता दर महिन्याला महामंडळाच्या पोर्टलवर जातो. तिथे माझ्या नावापुढे हप्ताची नोंद आणि मला मिळालेला व्याजाचा परतावा अशी नोंद असते.

माझ्या मूळ हप्त्यातून व्याज परतावा वजा होऊन केवळ मुद्दल तेच मला भरावे लागते. दर महिन्याला असा व्याज परतावा मिळत असल्याने मला आता केवळ ८ हजारांच्या आसपास हप्ता भरावा लागतोय. ही माहिती सांगताना नलावडे त्यांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता.

अमर नलावडे यांना आता कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून स्वतःचे असे नियमित उत्पन्न सुरु झाले आहे. कृषी निविष्ठा विकण्यासोबत परिसरातील शेतकऱ्यांना शेती पिकांबद्दल कृषी सल्ला देण्याचे कामही ते करत आहेत.

गावातील पहिलेच कृषी सेवा केंद्र चालक म्हणून गावकऱ्यांना त्यांचे कौतुक वाटते. मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला हे पाहून त्यांच्या आई वडिलांना समाधान वाटतेय. कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन शेतकरी  आई वडिलांच्या हाताने केले तो क्षण माझ्यासाठी अनमोल होता, असे भावपूर्ण उद्गार ते काढतात.

– पंकज जोशी