स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त झेंडा सत्याग्रह कार्यक्रम

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा केला जात असून स्वातंत्र्य चळवळीत घडलेल्या प्रमुख घटनांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाद्वारे ‘आझादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाद्वारे  उजाळा देण्यात येत आहे .वर्ष  1923 मध्ये नागपूर, जबलपूर येथे झेंडा सत्याग्रह झाला होता, या घटनेला उजाळा देण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या  अ‍धीन  नागपूरातील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात झेंडा सत्याग्रह या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते.  कार्यक्रमाचा आरंभ  केंद्राचे संचालक डॉ.दीपक खिरवडकर , केंद्राच्या उपसंचालक श्रीमती गौरी मराठे आणि  कार्यक्रम प्रमुख शशांक दांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास झाली.

 

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात स्वातंत्र्य चळवळीत झेंडा सत्याग्रहाचे महत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी  विद्यापीठाचे  प्रति कुलपती डॉ. चंद्रकांत रागीट यांनी याविषयावर  मार्गदर्शन केले .

दुसऱ्या सत्रात देशभक्ती पर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात “जगती जननी तेरी जय हो” या गीतांच्या सादरीकरणाने झाली. यानंतर,  “जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा”, “दे दी हमे आजादी”, “सत्याग्रह की परख यही”, “लहू का रंग एक”, “सत्यमेव जयते” इत्यादी गाण्यांचे सुंदर सादरीकरण कलाकारांनी केले. “शान हमारी प्राण हमारा” ध्वज गीताच्या सादरीकरणाने या संगीताच्या कार्यक्रमाची सांगता झाली. वर्धा येथील स्कॉलर म्युझिक  अ‍ॅकॅडमीच्या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमात गायिका कलाकार श्रीमती संध्या देशमुख, अपूर्व दुबे, अवंतिका धुमणे,  मदन दुबे, कल्याणी भिरंगी आणि तन्वी गलांडे यांचा समावेश होता.

कार्यक्रम अधिकारी  दीपक पाटील यांनी  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.