बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी ११ हजार ५९४ संस्थांची नोंदणी

मुंबई, दि. 5 : राज्यातील ग्रामीण भागात मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 11 हजार 594 संस्थांनी नोंदणी केली असून 5 हजार 764 संस्थांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात 29 पथदर्शी उपप्रकल्पांची अंमलबजावणी सुरु असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तर तासात लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले आहे.

यासंदर्भात सदस्य सर्वश्री सुरेश वरपुडकर, अमीन पटेल, सुलभा खोडके आदींनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देतांना कृषिमंत्री भुसे यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादक कंपन्या, गटांमार्फत संघटित करुन गटशेतीवर भर देणे व त्याद्वारे शेतमालाचे संकलन करुन शेतकऱ्यांना थेट प्रक्रियादार व निर्यातदारांशी जोडण्यात येईल. राज्यातील सर्व प्रमुख पिकांसाठी स्पर्धात्मक व सर्व समावेशक मूल्य साखळ्या विकसीत करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने 2100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. सप्टेंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले असून या प्रकल्पात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी संस्था व खरेदीदारांना ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. सन 2020-21 साठी प्रकल्पाकरीता 10.66 कोटी रुपये उपलब्ध करुन दिल्याचे श्री.भुसे यांनी म्हटले आहे.