मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सहज सोप्या, उडत्या चालींच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मनस्वी, निखळ असा गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. ते संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बप्पी लहरी यांनी तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशा गाण्यांनी आपली वेगळी शैली रूढ केली. त्यांच्यामध्ये गायक आणि संगीतकार असा उत्कृष्ट मिलाफ होता. त्यामुळे त्यांचा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला. त्यांनी काही धीरगंभीर संगीतरचनाही दिल्या. संगीत क्षेत्रातील जुन्या-नव्या प्रवाहातही त्यांनी आपली शैली जपत संगीत दिले. चित्रपट सृष्टीला या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची उणीव जाणवत राहील. ते आपल्या विशिष्ट शैलीमुळे आणि गाणी, संगीतामुळे अजरामर राहतील. ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ संगीतकार, गायक बप्पी लहरी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा लाभलेला, भारतीय चित्रपटांना ‘डिस्को’ संगीताची ओळख करुन देणारा, उडत्या चालीच्या गाण्यांनी तरुणाईला मंत्रमुग्ध करणारा, चार दशकांहून अधिक काळ चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा लोकप्रिय कलावंत आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय चित्रपट व संगीत रसिकांना त्यांची उणीव जाणवत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शास्त्रीय संगीताचा कौटुंबिक वारसा लाभलेल्या बप्पी लहरींचं संपूर्ण जीवन संगीतमय होतं. नया कदम, वारदात, डिस्को डांसर, हथकड़ी, नमक हलाल, मास्टरजी, डांस डांस, हिम्मतवाला, जस्टिस चौधरी, तोहफा, मकसद, सैलाब, द डर्टी पिक्चर सारख्या चित्रपटांच्या यशात बप्पी लहरींच्या संगीताचं मोठं योगदान आहे. बप्पी लहरींनी गायलेली गाणी आणि दिलेल्या संगीतांनं तरुण पिढीला कायम मनमुराद आनंद दिला. त्यांचं संगीत हा भारतीय चित्रपटविश्वाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांचं निधन ही भारतीय चित्रपट व संगीत क्षेत्राची मोठी हानी आहे. बप्पी लहरींची गाणी, त्यांचं संगीत, ‘सोनेरी’ अस्तित्व कायम चित्रपट रसिकांच्या स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्मरण करुन श्रद्धांजली वाहिली.