कृषी पर्यटन केंद्र चालकांच्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात करणार

कृषी पर्यटन (agro tourism) केंद्र चालकांशी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी साधला संवाद

पुणे, दि.8 : कृषी पर्यटनासाठी शासनाने कृषी पर्यटन धोरण जाहीर केले आहे. या कृषी पर्यटन धोरणासाठी कृषी पर्यटन केंद्र चालकांनी सुचवलेल्या विविध व चांगल्या सूचनांचा समावेश कृषी पर्यटन धोरणात (krishi paryatan) करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

रानफुला कृषी पर्यटन केंद्र मौजे ईगळून ता.मावळ जि.पुणे येथे राज्यातील कृषी पर्यटक केंद्र चालकांशी कृषी मंत्री श्री.भुसे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.बी.बोटे, पर्यटनचे उपसंचालक सुप्रिया करमरकर, रानफुला कृषी पर्यटन केंद्राचे श्रीकांत चव्हाण आणि राज्यातील कृषी पर्यटक केंद्रचालक उपस्थित होते.

श्री.भुसे म्हणाले, कृषी पर्यटन धोरण (agro tourism policy for maharashtra) राबविण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांना या धोरणाची व संकल्पनेची माहिती व्हावी म्हणून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्यक्ष चालवितांना येणाऱ्या समस्या सोडवणे. पर्यटन केंद्रांना सुलभ कर्जपुरवठा, मार्केटींगसाठी मदत करणे, शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरे तसेच जगभर व देशभरातील कृषी पर्यटन तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे आदी उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरे कृषी पर्यटन केंद्रावर आयोजित करणे. कृषी पर्यटनाच्या संबंधित शासनाच्या इतर विभागाचे परिपत्रक काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसायाची एक नवीन संधी उपलब्ध करुन देणे. ग्रामीण अर्थ कारणाला चालना देणे. शहरी पर्यटकांना शांत सुरक्षित व पर्यावरण पूरक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देणार आहे.

कृषी पर्यटन केंद्रांना रस्ते, वीज, पाणीपुरवठा व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी पर्यटन धोरणात याचा समावेश करणे. कोरोनाच्या काळात निसर्ग शेतीचे महत्त्व अधोरेखीत झाले आहे. त्यादृष्टीनेही निसर्ग शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी पर्यटन केंद्रांना प्रोत्साहन देण्यात येईल. कृषी पर्यटन चळवळ सशक्तपणे वाढावी या दृष्टीने पर्यटन संचालनालय व कृषी विभागाच्या सहाय्याने प्रयत्न करत आहे. कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांच्या (farmers)  प्रगती व सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.