Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात निधन

महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी  निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपुर्वी बाबासाहेब पुरंदरेंना घरात पाय घसरून पडल्याने इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.  बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात आले. वैकुंठ स्मशानभूमीत संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा-वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आहे. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषणक्षमता आणि प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये होती. बाबासाहेबांच्या पत्नी निर्मला पुरंदरे या त्यांच्या शिक्षणविषयक कार्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनाही पुण्यभूषण हा किताब मिळाला होता.

बाबासाहेबांची कारकीर्द

तरुणपणा पासून पुण्यातच स्थायिक झाले व भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते.

बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली आहेत..

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहुणे श्री.ग.माजगावकर यांच्याबरोबर ते ’माणूस’मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो.नी.दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केला.

 

दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामातील सहभाग

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

बाबासाहेब पुरंदरे यांचे लेखन

बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले.

पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांनी अनेक दस्तावेज स्वतः डोळ्याखाली घालून लिहिलेले राजा शिवछत्रपती हे पुस्तक. या पुस्तकाची १७वी आवृत्ती ३१ मार्च, २०१४ (गुडी पाडव्या)ला प्रसिद्ध झाली. पूर्वी एकच असलेले हे पुस्तक आता दोन खंडांत विभागले आहे.

 

नाट्यलेखन आणि दिग्दर्शन

याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या २७ वर्षांत १२५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग १४ एप्रिल, इ.स. १९८४रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी-इंग्रजीसह ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.’जाणता राजा’ मध्ये १५० कलावंत काम करत आणि शिवाय हत्ती घोडेही असत. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते आणि तिथे फिरता रंगमंच उभारण्यासाठी १०दिवस आणि उतरवण्यासाठी ५ दिवस लागत असत.

त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रप्रसारासाठी काही उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशांतही त्यांच्या व्याख्यानांतून आणि जाणता राजा या महानाट्यातून छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते.

अशीही दानशूरता

बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली.

 

बाबासाहेब पुरंदरे यांचे साहित्य

आग्रा

कलावंतिणीचा सज्जा

जाणता राजा

पन्हाळगड

पुरंदर

पुरंदरच्या बुरुजावरून

पुरंदऱ्यांचा सरकारवाडा

पुरंदऱ्यांची नौबत

प्रतापगड

फुलवंती

महाराज

मुजऱ्याचे मानकरी

राजगड

राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची २०१४ साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार – हेमा हेर्लेकर)

लालमहाल

शिलंगणाचं सोनं

शेलारखिंड. (ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी. या कादंबरीवर अजिंक्‍य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला “सर्जा‘ हा मराठी चित्रपटही निघाला होता.

सावित्री

सिंहगड

ध्वनिफिती

बाबासाहेब पुरंदरे यांचे कथाकथन – भाग १, २, ३ (कॅसेट्‌स आणि सीडीज)

शिवचरित्र कथन भाग १ ते १५ कॅसेट्‌सचा आणि सीडीजचा सेट

 

मिळालेले सन्मान आणि पुरस्कार

राजामाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न.र. फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतुमाधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे.

डी.वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल डी.लिट. (२०१३)

’बेलभंडारा’ या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉ.सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी श्रावण शुद्ध चतुर्थी होती, तो दिवस बाबासाहेबांचा तिथीने ९३वा वाढदिवस होता.

गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२१-२-२०१६)

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२)

महाराष्ट्रभूषण (इ.स. २०१५)

पद्मविभूषण (इ.स.२०१९)

Exit mobile version