देशातील कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे : पवार

नाशिक,खेडगाव, दि. ६ :  देशातील बहुसंख्य घटक कष्टकरी, शेतकरी यांच्या जीवनात बदल करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

खेडगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या नूतन इमारतीचा उदघाटन व ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडला. त्यावेळी बोलत होते.

यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, देशाला फक्त घटनाच नाही तर देशाला दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी या अगोदरच शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. यामुळे आपण त्यांचे नाव घेत आहोत. शाहू-फुले-आंबडेकर यांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले.नाशिक मध्ये आल्यावर मला आनंद होतो की इथे शेतीत नवनवीन प्रयोग केले जात आहे. इथले तरूण शेतीत नवीन प्रयोग करत असतात याचा आनंद आहे. अडचणी खूप आहेत सत्ता येते सत्ता जाते मात्र आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, श्रीराम शेटे आणि नरहरी झिरवाळ यांचा सत्कार आणि नवीन वस्तूच्या निमित्ताने आपण एकत्र आलो आहोत.सत्ता, मिळालेला अधिकार याचा कधीही परिणाम न होऊ देणारे असे श्रीराम शेटे आहेत. मधल्या काळात साखर कारखान्याबाबत नाशिकच चित्र फारस चांगलं नव्हतं. मात्र श्रीराम शेटे यांनी या भागात पुढाकार घेऊन कामाची सुरुवात केली आणि आज नाशिकची परिस्थिती बदलते आहे. विविध प्रयोग यानिमित्ताने श्रीराम शेटे करत असतात विजेची निर्मिती सुद्धा आपण करू शकतो. हे आपण सिद्ध केले आहे. राज्यातील १६० सहकारी कारखान्यांचा एक संघ आहे आणि त्या संघात दोन महत्वाचे लोक असतात त्यात एक अध्यक्ष आणि दुसरे उपाध्यक्ष हे उपाध्यक्ष पद सर्व साखर करखाण्याच्या लोकांनी श्रीराम शेटे यांच्यावर दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांचा देखील येथे सत्कार आज केला जात आहे. त्यांना उपाध्यक्ष पद द्यायचा विचार आला तेंव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र आम्ही त्यांनाच उपाध्यक्ष केले आज अनेक लोक असा उपाध्यक्ष पहिला नाही अशी प्रतिक्रिया देत आहेत असे सांगत यावेळेच साहित्य संमेलन विज्ञाला वाहून देणार होत त्यामुळे ह्या साहित्य संमेलनाला विशेष महत्व आले असल्याचे त्यांनी सांगितले.

योग्य मोबदला दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हाथ लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ – छगन भुजबळ

महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल-छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीवर पडलेला प्रत्येक थेंब पूर्वेकडे वळविला जाईल. आपल्याकडचे जे पाणी गुजरातला जात आहे ते आपल्याकडे आणले तर नाशिकचाच नाही तर मराठवाड्याचा देखील प्रश्न सुटेल एक थेंब देखील महाराष्ट्रातून गुजरातला देऊ देणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संपूर्ण पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीला कोणी हाथ लावणार नाही याची काळजी आम्ही घेऊ तसेच रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू तसेच जिल्ह्यातील बंद साखर कारखाने सुरू करण्यास प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रातील एक अजातशत्रू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची विशेष श्रीराम शेटे ओळख आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक, कृषी क्षेत्रात त्यांचा दबदबा असून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात अनेक कार्यकर्ते घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जडणघडणीत देखील त्यांचा बहुमुल्य वाटा असून नाशिक जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. जिल्ह्यातील कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतिशय महत्वपूर्ण कामे केलेली आहे. नाशिक जिल्ह्यात सहकारी तत्वावर कादवा सहकारी साखर कारखाना अतिशय यशस्वीपणे सुरु राहण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. कादवा सहकारी साखर कारखाना ज्या परिस्थिती मध्ये त्यांनी घेतला आणि तो जिथे नेऊन ठेवला ते महत्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील सर्व बंद केलेले कारखाने सुरू करण्यासाठी श्रीराम शेटे याना सल्लागार म्हणून नियुक्ती करावी असे सांगत श्रीराम शेटे हे नेहमी एकनिष्ठपणे पवार साहेबांच्या सोबतच राहिले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने अभ्यासू उपाध्यक्ष सभागृहाला मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले की, जेंव्हा कादवा कारखाना घेतला तेंव्हा परिस्थिती वेगळी होती. मात्र श्रीराम पवार यांनी कारखाना हातात घेतल्यानंतर त्याचा कायापालट केला. इथल्या गाव, पाडे याचा विकास त्या माध्यमातून केला. काटकसर कोणाकडून शिकावी तर ती श्रीराम पवार यांच्याकडून शिकली पाहिजे. कारखान्याचे संचालक सुद्धा दुचाकी घेऊन येतात. प्रत्येक गोष्टीत काटकसर हा कारखाना करत असतो असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की,भुजबळ साहेब अडचणीत असताना सुद्धा त्यांनी लोकांची कामे थांबवली नाही. जेल मधून देखील ते पत्र व्यवहार करत होते असे सांगत जिल्ह्यात त्यांनी विविध विकासाची कामे केले असल्याचे सांगतद्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आले आहेत प्रत्येक वर्षी काहीतरी अडचणी येत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, श्रीराम शेटे यांनी लोकहितासाठी आपले संपुर्ण आयुष्य वेचले असून या अमृत भूमीत श्रीराम शेटे यांचा सत्कार होत आहे याचा आनंद होत आहे.दिंडोरी, वणी च्या भागामध्ये श्रीराम पवार यांनी केलेले काम खूप मोठे आहे. साखर हा बायोप्रोडक्ट आहे. इथेनॉल ची निर्मिती कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. विजेवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येत आहे. त्यात इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या सुद्धा येतील त्यामुळे श्रीराम पवार यांनी नवं नवीन प्रोयग करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, डॉ.तुषार शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.