ग्रामीण भागातल्या 3.77 कोटी घरांना नळ जोडणी

ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराला 2024 पर्यंत नळ जोडणी देण्याच्या उद्देशाने, जीवनात परिवर्तन घडवणाऱ्या जल जीवन मिशन या अभियानाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 ला, लाल किल्यावरुन घोषणा केली. या अभियानाची घोषणा झाली तेव्हा 18.93 कोटी ग्रामीण घरांपैकी केवळ 3.23 कोटी (17%) घरांमध्ये नळ जोडणी होती.15.70 कोटी घरांना 2024 पर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याशिवाय सध्या असलेल्या पाणी पुरवठा व्यवस्था आणि नळ जोडण्या व्यवस्थित काम करत असल्याचीही खातरजमा करायची आहे. या अभियानाचा 19 कोटीपेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबाना थेट लाभ होणार असून सार्वजनिक आरोग्यही सुधारणार आहे.

कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊन असूनही पेय जल पुरवठा काम जारी राहिले. पाणी पुरवठा अत्यावश्यक बाबींपैकी एक असल्याने योग्य ती खबरदारी घेऊन या संदर्भातले काम सुरु ठेवण्यात आले. दर दिवशी सुमारे 1 लाख जोडण्या पुरवण्यात आल्या.

हे अभियान सुरु झाल्यापासून आतापर्यंत 3.77 कोटी पेक्षा जास्त घरांना नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत, म्हणजेच 7 कोटी पेक्षा जास्त ग्रामीण कुटुंबाना (36.5%) त्यांच्या घरात स्वच्छ पाणी पुरवठा सुरु झाला आहे,याचाच अर्थ एक तृतीयांश हून अधिक ग्रामीण घरांना नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळत आहे.