Lata Mangeshkar : भारतरत्न गानकोकिळा लता दीदी गेल्या

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर (९२) यांचे आज सकाळी ८ वा. १२. मिनिटांनी त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. ८ जानेवारीपासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्या जाण्याने करोडो चाहते शोक सागरात बुडाले आहेत.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकरांच्या (Lata Mangeshkar ) अतीव सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी रसिक श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून देण्याचे मोलाचे कार्य केले आहे. भारतीय चित्रपट-संगीतातील युगप्रवर्तक व सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकरांचा जन्म (सप्टेंबर २८, इ.स. १९२९) मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला.

वयाच्या पाचव्या वर्षी बाल-कलाकार :
त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. मराठी रंग भूमीवरील तेजस्वी गायकनट मास्टर दीनानाथ ह्यांच्या ह्या ज्येष्ठ कन्या होत. दीनानाथांच्या गायनकलेचा वारसा त्यांना लाभला.

नाटक आणि चित्रपटात भूमिका :
वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बालवयात लता मंगेशकरांनी छोट्या संगीत भूमिकाही केल्या. भावबंधन या नाटकातील ‘कुसूम’ च्या भूमिकेत ‘लाडकी असेच थोर’ या ‘देसकारा’ तील पदाला त्यांना हमखास टाळी पडे. ‘नवयुग’ व ‘प्रफुल्ल’ या मराठी चित्रसंस्थांच्या बोलपटांत त्यांनी अशाच छोट्या संगीत भूमिका केल्या.

पहिली मंगळागौर हा त्यांचा पहिला चित्रपट. यातील ‘मनू’ च्या भूमिकेत ‘नटली चैत्राची नवलाई’, किंवा ‘श्रावण आला तरूतरूला’ अशा समूहगीतांत त्यांचा आवाज होता. किती हंसाल! वा चित्रपटातील ‘नाचू या गडे खेळू सारी’ हे त्यांचे स्वतंत्र ध्वनिमुद्रित गीत होय. सुप्रसिद्ध कथ्थक नर्तकी रोहिणी भाटे यांच्यासाठी आपकी सेवामें या चित्रपटात त्यांनी म्हटलेले ‘पा लागू कर जोरीरे’ हे त्यांचे हिंदी चित्रसृष्टीतील पहिले पार्श्चगीत होय. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली. तत्पूर्वी 16 डिसेंबर 1941 रोजी, त्यांनी आई आणि बाबांचे आशीर्वाद घेऊन पहिल्यांदा रेडियोसाठी स्टुडिओमध्ये 2 गाणी गायली होती, असे त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे.

लता मंगेशकर यांचे गुरू :
मास्टर दीनानाथ यांच्याप्रमाणेच ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होत. इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक – मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या.

गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद :
अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सु. १,८०० वर चित्रपटांतील विविध रंग-ढंगांची सु. २२ भाषांतील गाणी त्यांनी म्हटलेली असून, त्यांची संख्या सु. २५ ते ३० हजारांच्या घरात सहज जाते. सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे.

गायिका आणि संगीतकार लता मंगेशकर :
‘आनंदघन’ या नावाने त्यांनी मराठी चित्रपटांना वैशिष्ट्यपूर्ण संगीतही दिले आहे. त्यांच्या आवाजाच्या असामान्य उंची-खोलीमुळे, लवचिकपणामुळे, अलौकिक फिरतीमुळे चित्रपट-संगीतकारांना नवनवीन प्रयोग करता येणे शक्य झाले व परिणामी त्या संगीताच्या कक्षा व सौंदर्य वाढले. ‘काळी दोन’ किंवा ‘पांढरी चार’ या उंच स्वरात त्या गात असल्याने, द्वंद्वगीतामध्ये पुरूष गायकाला आपल्या स्वाभाविक स्वरात गाणे शक्य होते आणि ते गीत अधिक गोडवा व परिणाम साधते. गीताचा प्रसंग समजून घेऊन, काव्यार्थ लक्षात घेऊन, शब्दांची योग्य ती फेक साधून तसेच भावाभिव्यक्तीसाठी आवाज कमीअधिक संस्कारित (मॉड्यूलेट) करून त्या गात असल्यामुळे त्यांच्या गीताला एक आगळेच सौंदर्य व दर्जा प्राप्त होतो.

‘भारतरत्‍न’ लता मंगेशकर :
लता मंगेशकर यांना राज्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. ‘भारतरत्‍न’ पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील एम एस सुब्बलक्ष्मी ( भारतरत्न – १९९८) नंतर दुसऱ्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला.
‘पद्मभूषण’ ‘आस्थान विद्वान’ (तिरूपती देवस्थान) ‘स्वर भारती’ (श्री शंकराचार्य) ‘कलाप्रवीण’ (जवाहरलाल नेहरू तंत्रशास्त्रीय विद्यापीठ) ‘डी. लिट्.’ (शिवाजी विद्यापीठ) ‘सूरश्री’ (लंडनच्या रॉयल ॲल्बर्ट हॉलमधील यशस्वी कार्यक्रमाबद्दल मिळालेला किताब) ‘स्वरलता’ (आचार्य प्र. के. अत्रे) इत्यादी.
त्यांना मिळालेल्या पारितोषिकांत राज्य शासनाचे पारितोषिक, फिल्म फेअर या चित्रपट नियतकालिकाची चार पारितोषिक, ‘फिल्म क्रिटिक’ ची पाच व ‘बेंगॉल जरनॅलिस्ट असोसिएशन’ ची सहा पारितेषिके, सूरसिंगार संसदेचे ‘तानसेन’ व ‘रसेश्वर’ ही पारितोषिक इत्यादींचा अंतर्भाव होतो.
लंडनच्या ‘ई. एम्. आय.’ कंपनीतर्फे त्यांच्या वीस हजारांवर ध्वनिमुद्रिका निघाल्याबद्दल त्यांना ‘सुवर्ण ध्वनिमुद्रिका’ भेट देण्यात आली असून, हा बहुमान मिळवणाऱ्या लता मंगेशकर या पहिल्याच भारतीय कलाकार होत. भारतातील प्रमुख शहरी त्यांचे चित्रपट संगीताचे यशस्वी कार्यक्रम झाले आहेत, तसेच त्यांचे परदेशांतील संगीत-दौरेही अत्यंत लोकप्रिय ठरले आहेत.