संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले आहे.

आधुनिक महाराष्ट्र ज्यांच्या असीम त्याग, समर्पणातून उभा राहिला आहे, त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सर्व हुतात्म्यांच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की, भाषिक स्वातंत्र्य आणि मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी या महाराष्ट्र सुपुत्रांनी प्राणपणाने दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे. हा लढा अजूनही संपलेला नाही. जग आणि पुढच्या पिढीपर्यंत या सीमा लढ्याच्या संघर्षाची धग पोहोचविणे, तिची धार कायम ठेवणे हेच या वीर महाराष्ट्रपुत्रांना खरे अभिवादन आहे. त्यासाठी मराठीची वज्रमूठ करूया.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतिदिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण वंदन केले आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाले पाहिजे ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेने एकजुटीने, प्राणपणाने लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषिक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील सर्व वीरांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन करतो.