लासलगावसह राज्यांत कांद्याला चांगला भाव

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारासह राज्यांत कोल्हापूर, पुणे, नगर, औरंगाबाद, नाशिक येवला सह अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळत आहे.  काही ठिकाणी ४ हजार रुपया पर्यंत भाव गेले असून सरासरी अडीच ते 3 हजार रुपये भाव मिळत आहेत.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल सोमवारी उन्हाळी कांद्याची ७२४ वाहनातून ८७०० क्विंटल आवक होऊन बाजार भाव किमान ११०० रु.कमाल भाव ४२५१ रु.तर सरासरी ३६०० रु.प्रती क्विंटल असा भाव मिळाला.शनिवारच्या कमाल भावाच्या तुलनेत सोमवारी कांदा दरात ११७१ रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सद्या बाजार पेठेत येणारा कांदा शेतकऱ्यांनी चाळीमध्ये साठवून ठेवलेला असून पावसामुळे मोठ्या प्रमाणात हा कांदा खराब झाला आहे त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कांद्याला देशांतर्गत बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने बाजार भावात वाढ झाली असली तरी केंद्र सरकारने कांदा निर्यात पुन्हा सुरू करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे
निर्यातबंदी होण्यापूर्वी उन्हाळ कांद्याला ३ हजार रु प्रति क्विंटल असा भाव मिळत होता त्यानंतर निर्यातबंदीचा निर्णय झाला त्यामुळे कांदा १ हजार रु प्रति क्विंटल ने घसरला.निर्यातबंदीचे पुढे काय होते याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली.त्यातच संपूर्ण भारतातून कांद्याला मागणी वाढली असून बऱ्याच राज्यात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने निर्यातबंदी असूनही सध्या भाव वाढले असल्याचे जाणकरांचे मत आहे.
निफाड तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा चाळीत साठवून ठेवलेला आहे,परंतु शनिवार झालेल्या वादळी पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे चाळी मधील साठवलेला पन्नास टक्के कांदा सडला आहे त्यामुळे कांद्याचे दर थोडे वाढले आहेत यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचे दर वाढल्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे.