Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

राज्यातील पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी राज्यात अव्वल; सर्वाधिक पीकांची नोंदणी नाशिक, अमरावती विभागात

मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सात सप्टेंबर अखेर राज्यातील साडेपंधरा लाखांपेक्षा जास्त खातेदार शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे पंधरा लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन ई-पीक पाहणी देखील नोंदविली असल्याची माहिती प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक शेतकरी खातेदारांची नोंदणी जळगाव जिल्ह्यात (१.१९ लाख) झाली आहे. द्वितीय क्रमांकावर धुळे (९४ हजार) तृतीय क्रमांकावर अमरावती (८१ हजार) जिल्हा आहे. सर्वाधिक नोंदणी नाशिक आणि अमरावती विभागात झाली आहे. त्या खालोखाल प्रतिसाद कोंकण आणि नागपूर विभागात दिसून येतो आहे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाला शेतकरी वर्गाचा चांगला प्रतिसाद मिळत असून क्षेत्रीय स्तरावर महसूल अधिकारी, तलाठी व मंडळ अधिकारी शेताचे बांधावर जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने पिकांच्या काढणी पूर्वी पीक पेरा ऑनलाईन भरणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागात सध्या लगबग सुरु आहे, असे श्री. जगताप यांनी सांगितले. सर्व साखर कारखान्यातील ऊस नोंदणीसाठी सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी यांनी ई -पीक पाहणीचा १०० टक्के वापर करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नुकत्याच दिल्या आहेत, असेही श्री. जगताप यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी बाबतच्या सर्व अडचणी दूर होतील. त्यासाठी सर्व शेतकरी खातेदार यांनी ॲप डाऊनलोड करून वापरावे. आपल्या पिकाचा अक्षांश रेखांश सह फोटो अपलोड करून पीक पेरा ऑनलाईन नोंदवावा, असे आवाहनही श्री.जगताप यांनी केले आहे.

Exit mobile version