३१.७३ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रक्कमेपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेंतर्गत बँकांनी 35.10 लाख उपयुक्त कर्जखात्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर उपलब्ध केली असून यापैकी 32.82 लाख कर्जखात्यांना विशिष्ठ क्रमांक देण्यात आला. यापैकी 32.37 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्यातील 31.73 लाख शेतकऱ्यांना रक्कम 20.250 कोटी रकमेचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

याबाबत विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री.पाटील बोलत होते.

सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, 32.37 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्यातील 31.81 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम 20,291 कोटी मंजूर करण्यात आली. यापैकी 31.73 लाख शेतकऱ्यांना 20.250 कोटी रक्कमेचा लाभ दिला आहे. तसेच 45,079 कर्जखात्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे 2 हजार 238 कर्जखात्यांबाबत तक्रारीचे निराकरण सुरु आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून रु.50 हजार पर्यंत लाभ देण्यात येणार आहे. यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. याचा लाभ 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.