सुएझ कालवा मोकळा; शेतमाल निर्यात सुरळीत

मागील सहा दिवसांपासून सुएझच्या कालव्यात अडकलेल्या ‘एव्हरग्रीन’ मालवाहू जहाजाची अखेर सुटका झाल्याचे वृत्त मिळत आहे. इजिप्तमधील स्थानिक वेळ पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या जहाजाची सुटका झाली. त्यामुळे सुमारे ४५० जहाजे अडकलेला पूर्व-पश्चिम असा सागरी मार्ग जागतिक वाहतुकीसाठी लवकरच पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आपल्या शेतमाल निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पनामाचा ध्वज असलेले ‘एव्हरग्रीन’ नावाचे मालवाहू जहाज आशिया व युरोप दरम्यान वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. अवाढव्य जहाज सुएझ कालव्याच्या सहा किलोमीटर उत्तरेला दक्षिण प्रवेशद्वाराकडे ते सुएझ शहरानजीक (आफ्रिका व सिनाई द्वीपकल्पात) अडकून पडले होते. मंगळवारपासून या जहाजाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मंगळवारी एका निमुळत्या भागात ते अडकले. त्यामुळेे या भागात सागरी वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि अनेेक लहान-मोठी व्यापारी जहाजे अडकून पडली होती. युरोपात प्रवेश करण्यासाठी जहाजांना दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावे लागत असल्यामुळे महाराष्ट्र, भारतासह अनेक देशांतील व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जहाज बाहेर काढण्यासाठी केलेले विविध प्रयत्न
बर्नहार्ड शुल्ट जहाज व्यवस्थापन कंपनीचे तंत्रज्ञान व्यवस्थापक ‘एव्हरग्रीन’ यांनी दिलेल्या माहितीनुसाार, शुक्रवारी हे जहाज बाजूला काढण्याचे प्रयत्न फसले होते. हे मोठे जहाज हलवण्यासाठी आतल्या भागात पाणी ओतून विशिष्ट यंत्रणेचा वापर करून ते दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नांमध्ये अनेक टग बोट्स म्हणजेच मोठे जहाज अडकल्यानंतर ते खेचून बाहेर काढण्यासाठी वापरण्यात येणारी विशेष बोटी वापरण्यात आल्या. या प्रयत्नांना यश आले असून हजारो कंटेनर असणारे हे जहाज बाहेर काढण्यात आले आहे.
शोई कायसेन कंपनीचे अध्यक्ष युकिटो हिगाकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुएझ कालवा प्राधिकरणाने शनिवारी जहाज बाजूला करण्यासाठी दोनदा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले होते. जास्त भरतीच्या लाटांचा फायदा घेऊन हे प्रयत्न केले गेले. जपानच्या शोई कायसन केके कंपनीने हे जहाज बाजूला काढण्यासाठी १० बोटी पाठवल्या होत्या. आता हे जहाज बाहेर काढल्यानंतर त्याच्या सुरक्षेची चाचपणी करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
वाहतूक ठप्प झाल्याने ६,००० मैल अतिरिक्त अंतराचा वळसा
सुएझ कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्यामुळे मालवाहू जहाजांना तब्बल ६,००० मैल अतिरिक्त अंतर कापावे लागणार असून यासाठी जवळपास ३,००,००० डॉलर्सचा जादा खर्च इंधनासाठी करावा लागणार आहे. जागतिक व्यापारापैकी या कालव्यातून १२ टक्के व्यापार सुएझ कालव्यातून होतो. कालव्यातील जलवाहतूक ठप्प झाल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती.