भारतात, दररोज दहा लाख लोकांमागे 180 चाचण्या केल्या जात आहेत, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद दीर्घकाळापर्यंत दररोज 140 चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. तसेच 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 बाधितांचा दर आहे राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे.
याव्यतिरिक्त, मृत्यूचे प्रमाण घटून 2.43% पर्यंत खाली आले आहे. बर्याच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यु दर राष्ट्रीय मृत्यु दरापेक्षा कमी आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित कोविड-19 वरील कारवाई, सज्जता आणि अद्ययावततेबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
भूषण म्हणाले की, बाधितांचा दर खाली आणण्यासाठी आक्रमक चाचणी, हे कोविड-19 विरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. “कोविड-19 सकारात्मकतेचा दर 5% टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी ही चाचणी पातळी कायम ठेवण्याचे उद्दीष्ट आहे,”
भूषण पुढे म्हणाले, देशात आजपर्यंतची कोविड-19 बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 4,02,529.आहे. आपण आता सक्रिय प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जे रूग्ण आहेत ते रुग्णालय, केअर सेंटरमध्ये किंवा घरी विलगीकरणात आहेत. आरोग्य मंत्रालयाचे ओएसडी यांनी भारतात कोविड-19 चा आलेख सादर करताना सांगितले की, सक्रिय रुग्णांचे प्रमाण सतत कमी होत आहे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतातल्या दहा लाख लोकसंख्येमध्ये कोविड-19 चे प्रमाण हे जगातील सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे तर काही देश असे आहेत जिथे ही संख्या भारताच्या तुलनेत 12 – 13 पट जास्त आहे. या व्यतिरिक्त, भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे कोविड-19 संबंधित मृत्युदर जगातील सर्वात कमी मृत्युदरांपैकी एक आहे, तर काही देशांमध्ये ही संख्या भारताच्या तुलनेत 21 – 33 पट जास्त आहे.
भूषण म्हणाले, केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य करत आहे. सर्व निर्णय विज्ञान आणि पुरावा-आधारित माहितीच्या आधारे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले जात आहेत,
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक (एनसीडीसी) डॉ. एस. के. सिंग म्हणाले, दिल्लीतील सेरो-सर्व्हेमध्ये 22.86% संसर्ग होण्याचे प्रमाण दर्शविले आहे, जे लॉकडाऊन आणि कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांद्वारे केलेल्या प्रयत्नांची परिणामकारकता दर्शवितात. त्याच वेळी उर्वरित 77% असुरक्षित आहेत. म्हणूनच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असा इशारा त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, हे स्वाभाविक आहे की लक्षणे नसलेले काही लोक देखरेख यंत्रणेच्या चाचणीतून निसटले असण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत, सेरो सर्वेक्षण समुदायात कोविड-19 संसर्गाच्या व्यापकतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते.
आयजीएम अँटीबॉडी सक्रिय कोविड-19 संसर्गाचे अस्तित्व दर्शविते, परंतु ते संपूर्ण प्रादुर्भावाचे स्पष्ट चित्र देत नाही. दुसरीकडे, आयजीजी अँटीबॉडी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. अॅन्टीबॉडी डिटेक्शन चाचण्यांमुळे समाजात होणाऱ्या संसर्गाच्या व्यापकतेचे आकलन होण्यास मदत होते, तर आरटी-पीसीआर चाचण्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट्स प्रत्यक्षात कोविड-19 रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरतात, असे डॉ. सिंह यांनी स्पष्ट केले. 27 जून ते 10 जुलै या कालावधीत करण्यात आलेला 20,000 हून अधिक सहभागींचा सध्याचा सेरो-सर्वे हा दिल्लीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आयसीएमआरने केलेल्या सीरो-सर्वेचा पाठपुरावा आहे. दिल्लीतील सेरो-सर्व्हेसाठी 1 वर्षावरील सर्व वयोगटाचे नमुने घेण्यात आले होते.
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले, एम्स, नवी दिल्ली, उद्या आरोग्य मंत्रालय आणि नीती यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19 बाबत राष्ट्रीय क्लिनिकल ग्रँड राउंडची सुरूवात करत आहे. डॉक्टरांद्वारे केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि पुरावा-आधारित कोविड-19 उपचार समोर आणण्यास मदत करेल, असे ते म्हणाले.
दिल्लीत संक्रमणाच्या दराबाबत नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, दिल्लीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात सहा महिन्यांनंतरही हा संसर्ग केवळ 23%पर्यंत पोहोचला आहे. हे असे दर्शवते की सरकार आणि समुदायाद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे या पातळीपर्यंत संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. यामुळे आम्हाला प्रतिबंधात्मक उपायांच्या परिणामकारकतेबाबत आत्मविश्वास मिळाला आहे. भूषण म्हणाले, तज्ञांशी सल्लामसलत करून वाढवलेल्या चाचण्या आणि प्रतिबंधात्मक धोरणामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील कोविड-19 च्या 37%सकारात्मकतेच्या दरापेक्षा नवीन रुग्णांची संख्या आताच्या पातळीवर आली आहे.
लसीच्या चाचण्यांबाबतच्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले, कोविड-19 लसीच्या चाचण्यांसाठी आवश्यक वैज्ञानिक, नैदानिक नैतिक कठोरपणा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक नियमन सुविधा सुनिश्चित केली जात आहे. परवडणारी कोविड-19 लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
नीती आयोगाच्या आरोग्य सदस्यांनी चाचणीसंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, काही आठवड्यांत दररोज 5 लाखाहून अधिक कोविड चाचणी क्षमता प्राप्त करू आणि आगामी काळात आपण दररोज दहा लाख चाचण्यांचा टप्पा पार करू.
माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजेश भूषण यांनी सांगितले की कोविड वरील संयुक्त देखरेख गट काही रुग्ण बरे झाल्यांनतर उद्भवलेल्या आरोग्यविषयक गुंतागुंतीचे विश्लेषण करीत आहे.