गेल्या 24 तासांत देशभरात 55,342 नवे कोविड रुग्ण

चाचण्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे सक्रीय रुग्णांची संख्या सातत्याने कमी राखण्यात यश

केंद्र सरकारचे निश्चित धोरण आणि केंद्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून टप्याटप्याने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, यामुळे, भारताने जागतिक पातळीवर, प्रति दशलक्ष  लोकसंख्येच्या तुलनेत, कोविडच्या  रुग्णांचे प्रमाण सर्वात कमी राखण्यात आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही  सर्वात कमी राखण्यात यश मिळवले आहे. जागतिक पातळीवर प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे रुग्णांची संख्या 4,794, इतकी आहे, तर भारतात ही संख्या 5,199  इतकी आहे. इंग्लंड, रशिया, दक्षिण आफ्रिका , अमेरिका आणि ब्राझील या देशांत  सरासरीपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळते आहे.

भारतात प्रती दशलक्ष लोकांमागे रुग्णांची मृत्यूसंख्या 79 आहे, मात्र जगात ही संख्या दक्षलक्ष/138 इतकी आहे.

चाचण्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, भारत सर्वाधिक चाचण्या करणाऱ्या देशांपैकी एक ठरला आहे.  गेल्या 24 तासांत देशात 10,73,014 चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण चाचण्यांची संख्या 8.89 कोटी (8,89,45,107) इतकी झाली आहे.

चाचण्यांची संख्या सातत्याने वाढवत नेल्यामुळे, कोविड रुग्ण लवकरात लवकर सापडण्यात मदत झाली आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आणि मृत्यूदर कमी झाला.

भारताची तुलना अमेरिका, इंग्लंड, रशिया, फ्रांस अशा श्रीमंत देशांशी करणे योग्य ठरणार नाही, कारण भारतात त्यांच्यासारखी परिस्थिती नाही. भारताची लोकसंख्या आणि त्या तुलनेत संसाधनांचे प्रमाण, याचा समतोल इतर देशांपेक्षा वेगळा आहे. तसेच, प्रती दशलक्ष लोकसंख्येमागे, डॉक्टर्स आणि परिचारिकांची संख्या, जीडीपीतील आरोग्यासाठीची तरतूद, अशा निकषांवर भारताची इतर उच्च उत्पन्न असलेल्या विकसित देशांसोबत तुलना करणे अन्यायकारक ठरेल. व्यापक परिप्रेक्ष्यात पहिले असता, कोविड व्यवस्थापना संदर्भात भारताची धोरणे आणि गेल्या अनेक महिन्यांत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामांमुळे अत्यंत उत्साहवर्धक परिणाम दिसले आहेत.

भारतात नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 55,342 नवे रुग्ण आढळले.

केंद्र सरकारच्या सर्वसमावेशक आणि आक्रमक चाचण्यांचे धोरण, योग्य प्रकारे रुग्णांचा माग घेणे आणि सर्वेक्षण, रूग्णालयात उपचार आणि प्रमाणित उपचार पद्धतींचे पालन या सर्व उपाययोजनांमुळे, दररोज आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

गेले पाच आठवडे, दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दररोजच्या रुग्णांची साप्तहिक सरासरी संख्या 92,830 इतकी होती, मात्र आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात ही संख्या 70,114 पर्यंत कमी झाली आहे.

सक्रीय रुग्णांच्या संख्येत देखील सातत्याने घट होत आहे. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकून पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत 11.69%इतकी म्हणजे 8,38,729 इतकी आहे. आज सलग पाचव्या दिवशी सक्रीय रुग्णांची संख्या 9 लाखांपेक्षा कमी आहे.

एकूण रूग्णांपैकी 76% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात रुग्णसंख्या सर्वाधिक आहे. दोन्ही राज्यात सध्या दररोज 7000 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. कर्नाटक, केरळ, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि छत्तिसगढ या राज्यात, नव्याने रुग्णसंख्या वाढतांना दिसत आहे.

गेल्या 24 तासांत, 77,760 रुग्ण बरे झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 62 लाखांपेक्षा अधिक (62,27,295) झाली आहे. दररोज रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे, देशात रुग्ण बरे होण्याचा दरातही सुधारणा झाली आहे. सध्या हा दर 86.78% इतका आहे.बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी 78% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आहेत.

महाराष्ट्रात एका दिवसांत, 15,000 रुग्ण बरे झाले तर  कर्नाटकात ही संख्या 12,000 इतकी आहे.

कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही आज सलग दहाव्या दिवी 1000 पेक्षा कमी आढळली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोविडमुळे 706 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 79% मृत्यू दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक (165 मृत्यू ) म्हणजे 23% मृत्यूंची नोंद झाली आहे.