कोरोना: 10 वी अऩ् 12 वीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, अशी घोषणा बुधवारी (दि. 12) बोर्डाने केली आहे. कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बोर्डाने परीक्षा पुढे न ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. याशिवाय शाळांना वेळापत्रकानुसार तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेता येतील, तसेच बोर्डाच्या परीक्षा नियोजित तारखांनाच होतील.

महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता 12 वीच्या लेखी परीक्षा 4 मार्च 2022 पासून सुरू होईल. तसेच 10 वीची लेखी परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी इयत्ता 10 वी, 12 वीच्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. त्यानंतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा सुमारे 32 लाख विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2022 मध्ये बसणार आहेत.