पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीपूर्वी मदतीचा पहिला हप्ता

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींचा निधी वितरित

जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

लोकांचा पैसा लोकहितासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी जून ते ऑक्टोबर 2020 या काळात 41 लाख हेक्टर जमीन अतिवृष्टी, पुराने बाधित झाल्याचे सांगितले. यात मोठ्याप्रमाणात शेतपिकांचे नुकसान होताना घरे पडली, जमिनी वाहून गेल्या. यासर्वांना मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.

धान्य खरेदी केंद्रे सुरु

मुख्यमंत्र्यांनी राज्यात कापूस खरेदी केंद्रे सुरु झाल्याचे सांगतांना उडीद, मूग, सोयाबीन, तूर यासारख्या इतर शेतपिकांची शासन खरेदी  करणार असून  येत्या महिनाभरात ही केंद्र  सुरु करण्यात येतील अशी माहिती यावेळी दिली.

हे सरकार तुमचेच

फोर्सवन मधील सैनिकांना प्रोत्साहनभत्ता दिल्याचे, माजी सैनिकांसाठी निवासी मालमत्ता कर (घरपट्टी) माफ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. समाजातील कोणताच घटक वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर तसेच ओबीसी आरक्षणासंदर्भात भाष्य  केले. हे सरकार तुमचेच असून तुमच्या हक्काच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा  त्यांनी पुनरुच्चार केला.

 ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’ अभियानाला मोठे यश

कोरोना नियंत्रणात शासनासोबत राज्यातील जनतेला सहभागी करून घेण्यासाठी  ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी ’  हे अभियान राबविण्यात आले.  यात 60 हजार टीम सहभागी होऊन त्यांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, या तपासणीमध्ये साडे तीन लाख आयएलआय व सारीचे रुग्ण आढळले. 13 लाख लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जाणवले तर 8 लाख 69 हजार 370 लोकांना मधुमेह असल्याचे लक्षात आले. 73 हजार लोकांना हृदयरोग तर 18843 लोकांना कर्करोग असल्याची माहिती यातून मिळाली. 1 लाख 6 हजाराहून अधिक लोकांना इतर आजार असल्याचे दिसून आले. या अभियानात 51 हजारापेक्षा अधिक लोकांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. घरोघरी जाऊन राज्यातील लोकांची आरोग्य तपासणी केल्यामुळे राज्याचा आरोग्यविषयक नकाशा यातून स्पष्ट झाला.

वेळेत कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ’ अभियानात सहभागी होऊन काम करणाऱ्या सर्व यंत्रणेतील कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व महाराष्ट्र तुमचा ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.

 मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई

मास्क न वापरणे ही गोष्ट अजिबात चालवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एक कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण 400 जणांना बाधित करू शकतो. ते चारशे जण किती जणांना बाधित करतील याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्या विरुद्ध कडक दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

 आलेख घटता पण काळजी घेण्याची गरज

दिवाळीनंतर मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याबाबत नियमावली तयार करून निर्णय घेऊ हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप काळजी घेण्याची, ज्येष्ठांना जपण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्यावर टीका झाली तरी चालेल परंतु मी माझ्या महाराष्ट्राचे आणि माझ्या जनतेचे हित जपणारच, ही ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणार

मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी थांबवण्याचे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेड प्रकरणी होणाऱ्या टीकेला योग्य वेळी उत्तर देऊ असे म्हटले. तसेच मुंबईकरांच्या हितासाठी सुविधांची उभारणी करताना त्यात कुणीही मीठाचा खडा टाकू नये, असे आवाहन त्यांनी  केले.

सावधपणे पाऊल पुढे

मुख्यमंत्र्यांनी अनलॉक प्रक्रियेमध्ये राज्यात आपण सावधतेने पाऊल पुढे टाकत असल्याचे सांगताना नियमावली निश्चित करून आतापर्यंत रेस्टॉरंट, नाट्य आणि सिनेमागृहे व्यायामशाळा, ग्रंथालये आदी बाबींना मान्यता दिल्याची माहिती दिली.  दिवाळीनंतर नियमावलीच्या आधारे 9 वी ते 12 वी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महिलांसाठी लोकल प्रवासाला मान्यता देण्यात आली असून सर्वांसाठी लोकलची मान्यता देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरु असून रेल्वेमंत्री पियुष गोयल चांगले सहकार्य करत असल्याचेही ते म्हणाले.

मेट्रो मार्गिकेसाठी माफक व्याजदरात कर्ज

मुंबई – ठाणे प्रवास गतिमान होण्यासाठी मेट्रो मार्गिकेसाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यू विकास बँकेकडून 45 दशलक्ष युरोचे कर्ज माफक व्याजदरात घेण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्रात गुंतवणूक करताना खूप आश्वासक वाटत असल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदार देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले.