खरीप विशेष : सोयाबीन बियाणे पेरताना अशी घ्या काळजी

सोयाबीन उत्पादनावर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी बीजोत्पादन ते पेरणी आणि पीकवाढीच्या अवस्था व काढणीपर्यंतच्या विविध स्तरांवर दिलेल्या शिफारशी व इतर सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने व्यवस्थापन केले, तर सोयाबीनचे चांगले उत्पादन घेता येते. त्यासाठी या काही टिप्स…

सोयाबीन बियाणे हाताळताना व पेरणी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी :

*सोयाबीन बियाण्यांस पेरणीपूर्वी पिशवीत ठेवलेल्या बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी.
*पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी. तसेच बियाण्यांची पिशवी व पिशवीवरील टॅग जपून ठेवावे.
*शिफारशीप्रमाणे ७५ ते १०० मि. मी. पाऊस पडल्यानंतरच सोयाबीन बियाण्यांची पेरणी करावी. अल्प पावसावर पेरणी केल्यास बियाणे अर्धवट ओलीवर पडते व पुढे दोन ते तीन दिवस पाऊस न पडल्यास कुजून खराब होते.
*सोयाबीन बियाण्यांची ४ ते ५ सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर पेरणी करू नये.
*मध्यम ते भारी जमिनीत सोयाबीनची पेरणी ४ सें. मी. पेक्षा जास्त खोलीवर केल्यास त्याचा उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो. सोयाबीन पेरणीनंतर लगेचच मोठा पाऊस झाला तर बियाणे वाहून जाते किंवा दडपते व रोपांच्या संख्येत घट येते.

*सोयाबीन बियाण्यांची धूळपेरणी करू नये.
*यांत्रिकीकरणाच्या सुलभतेमुळे अनेकदा जमिनीची जास्त मशागत केली जाते. जमीन बर्‍याच खोलीपर्यंत भुसभुशीत केली जाते. अशा जमिनीत पेरणी करताना बी खोलवर पडते. नंतर जोरात पाऊस झाल्यास जमीन थापली जाते व त्याचा बियाणे उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो.
*पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यांची साठवण ओलसर ठिकाणी किंवा पोत्यांवर जास्त दाब पडेल (एकावर एक जास्त पोती रचून ठेवल्यास) अशा ठिकाणी करू नये.

*सोयाबीन बियाण्यांचे कवच अतिशय नाजूक असल्यामुळे बियाणे हाताळताना जास्त आदळआपट होणार नाही, याची काळजी घ्यावी. असे झाल्यास त्याचा उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो.

*पेरणीसाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे बियाणे मात्रा वापरावी. शिफारशीपेक्षा कमी बियाणे कदापिही वापरू नये.
*पाणी साचलेल्या जमिनीत पाण्याचा निचरा होईपर्यंत पेरणी करू नये.
*पेरणी झाल्यावर पाऊस न आल्यास पाणी देण्याची व्यवस्था असल्यास ताबडतोब पाणी द्यावे.

सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी तसेच केसाळ अळींचा प्रादुर्भाव होत असतो. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी बीजोत्पादकांनी पिकावर ५ मि. लि. फेनव्हेलरेट (२० टक्के प्रवाही) किंवा २० मि. लि. क्विनॉलफॉस (२५ टक्के) किंवा १० मि. लि. इन्डोक्साकार्ब (१४.५ टक्के प्रवाही) किंवा १३ मि. लि. ट्रायझोफॉस (४० टक्के प्रवाही) किंवा २० मि. लि. क्लोरोपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) यांची दोन वेळा फवारणी करावी. तसेच ५ मि. लि. फ्लुबेनडीयामाईड व ईमॉमेक्टिन बेन्झोएट घटक असलेल्या कीटकनाशकाची (७ ते १० ग्रॅम) १० लिटर पाण्यात मिसळून एक वेळा फवारणी करावी. जेणेकरून किडीमुळे बियाणे उत्पादकता तसेच गुणवत्ता कमी होणार नाही.

सोयाबीन बियाण्यांचा क्षेत्रीय र्‍हास टाळण्याकरिता पीक फुलोरा अवस्थेत (आर-२ स्टेज) असताना व शेंगातील दाणे पक्व (आर-६ स्टेज) झाल्यावर सोयाबीन पिकावर मॅन्कोझेब (०.२ टक्के) व कार्बेन्डॅझिम (०.१ टक्के) बुरशीनाशकाची फवारणी करावी. कीटकनाशकांच्या फवारणीसोबत बुरशीनाशकांची दोन वेळा फवारणी करावी. त्यामुळे कीड नियंत्रित होऊन बुरशीमुळे बियाण्यांचा क्षेत्रीय र्‍हास होणार नाही.

सोयाबीन बियाण्यांची कापणी व मळणी योग्य वेळी करावी. मळणीनंतर बियाणे वाळवल्यानंतर योग्य प्रकारे साठवणूक करावी. थ्रेशरने मळणी करताना सोयाबीनचे कवटे थ्रेशरमध्ये सारख्या प्रमाणात टाकावे. कमी प्रमाणात टाकल्यास सोयाबीन बियाण्यांस इजा होऊन त्याचा उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होतो.

बीजोत्पादन कार्यक्रमातील बियाणे वाळविताना मोठा ढिग न लावता पातळ थरात वाळवून मळणी करावी. बीजोत्पादन कार्यक्रमातील सोयाबीन बियाणे मळणी करताना ट्रॅक्टरवरील थ्रेशरचा वापर टाळावा आणि मळणी यंत्राचे फेरे (आरपीएम) ३५० ते ४५० ठेवावेत व बियाण्यांची आर्द्रता १३ ते १४ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवू नये.

सोयाबीन बियाणे साठविताना पोत्यातील बियाण्यांची आर्द्रता १३ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये. तसेच साठवणुकीमध्ये पोत्यांची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त ठेवू नये. बीज प्रक्रिया केंद्रावर सोयाबीन बियाणे पोहोच करताना ज्यूट बारदाण्यामध्ये ५० किलोपर्यंत बियाणे भरून पोहोच करावे.*

– यू. वाय. गावंडे