बियाण्यांची उगवणक्षमता तपासल्यानंतरच पेरणी करा

नागपूर, दि. 2 : आगामी खरीप हंगामात पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासल्यानंतरच प्रत्यक्ष पेरणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

खरीप हंगाम नियोजन तसेच खते व ‍बियाण्यांच्या उपलब्धतेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी घेतला. विभागात खरीप हंगामात 19.35 लाख हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून शासनाने यावर्षी कमी दिवसाच्या पीक पद्धतीचा अवलंब करण्यासंदर्भात आवाहन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धता करण्यासंदर्भात यावेळी निर्देश देण्यात आले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागातील खरीप आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी महसूल उपायुक्त मिलिंद साळवे, सामान्य उपायुक्त श्रीकांत फडके, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता उत्तम पवार, अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी, कृषी सहसंचालक प्रज्ञा गोडघाटे तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

विभागात खरीप हंगामामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करुन त्याऐवजी निंबोळी आदी जैविक खतांचा वापर वाढविण्याला प्राधान्य देण्यात येत असून सरासरी दहा टक्के रासायनिक खत कमी करण्यासोबतच उत्पादन वाढीच्या दृष्टीने धान व सोयाबीनची पेरणी करताना पट्टापद्धतीचा वापर करणे, कापूस कापसाची लागवड, बीबीएस पद्धतीने करणे तसेच किड रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी निंबोळी अर्काचा वापर करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना करताना डॉ. संजीव कुमार म्हणाले की, सोयाबीन बियाण्यांची मागणीनूसार पुरवठा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर नियोजन करावे. विभागात 1 लाख 61 हजार क्विंटलची मागणी असून पुरवठा त्यानुसार नियंत्रित करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

विभागात रासायनिक खतांच्या मागणीनुसार युरीया, डीएपी, संयुक्त खते आदींचा साठा उपलब्ध आहे. ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत नागपूर विभागाला 6 हजार 300 चे लक्ष्यांक आहे, त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

खरीपासाठी 4 लाख 32 हजार हेक्टर नियोजन

जलसंपदा विभागातर्फे खरीप हंगामासाठी 4 लाख 29 हजार 177 हेक्टरचे क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. मागील वर्षी 3 लाख 30 हजार 306 हेक्टर खरीप क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता ज. ग. गवळी यांनी दिली.

खरीप हंगामासाठी  2020-21 या वर्षासाठी एकूण 5 लाख 86 हजार 406 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत एकूण 5 लाख 43 हजार 313 हेक्टर सिंचन साध्य झाले आहे. यावर्षी  खरीपासाठी 4 लाख 32 हजार 055 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे.

विभागात खरीप सिंचनाच्या 10 मोठे प्रकल्प, 51 मध्यम व 336 लघु असे एकूण 397 प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहेत. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रचलित पीक पद्धतीत बदल करणे, सगुणा पद्धतीने धान पिकांची लागवड करणे, पाणी वापर काटकसरीने करणे याबाबत गावांमध्ये जावून जागृती करण्यात येत असल्याची माहिती अधीक्षक अभियंता श्री. गवळी यांनी दिली.

प्रारंभी प्रज्ञा गोडघाटे यांनी  कृषी विभागाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.