…अन् शेत पिकानं बहरलं!

मी काशिनाथ वळवी नंदुरबार जिल्ह्यात पथराई शिवारात 10 एकराचे शेत आहे. तिन्ही मुले शेतातच राबतात. संपूर्ण कुटुंब शेतावर अवलंबून असल्यानं दरवर्षी कर्ज काढून शेत पिकवायचो. पीक आल्यावर कर्ज फेडलं जायचे. मात्र गेली तीन वर्षे पाऊस कमी झाल्यानं पीकांचं नुकसान झालं आणि कर्ज फेडता आले नाही.

सतत तीन वर्षे पाऊस कमी झाल्यानं गावाला पाणी देणारी शेतातली विहीर आटली. पाण्याअभावी पीक हातचे गेले. कर्जाची रक्कम वाढू लागल्यानं आणि गोठ्यातील गुरांना चारा-पाणी देण्याची समस्या असल्यानं मोठा प्रश्न उभा राहिला. बँकेडून नवे कर्ज मिळत नव्हते आणि सावकाराकडील व्याजाचे दर परवडणारे नव्हते.

शासनानं कर्जमुक्ती योजनेची घोषणा केल्यानं मनात नवी आशा निर्माण झाली. सोसायटीचं 1 लाख 45 हजाराचे कर्ज आणि 35 हजाराचे व्याज प्रमाणिकरण केल्यानंतर ते माफ झाले. नवे कर्ज मिळण्याचा मार्गही मोकळा झाला. नव्याने 1 लाख 45 हजाराचे कर्ज मिळाले. हाताशी पैसा आल्यानं नव्या उत्साहानं शेतात ऊस, पपई, मिरची आणि कापसाची लागवड केली.

आज शेत पिकानं बहरलं आहे. पपईचा पहिला तोडा झाला, हाताशी पैसे आले आहे. पाऊस चांगला झाल्यानं विहिरीला चांगले पाणी आले आहे. दुष्काळात ग्रामस्थांनी बंधारा बांधल्यानं पाटचारीलाही पाणी आलं आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी सापडला असताना शासनाच्या महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेने दिलासा दिला आहे.

पथराई सोसायटी अंतर्गत पथराई, खोडसगाव, वरुळ, आभरावी शिवार, सरवाळा येथील 109 शेतकऱ्यांचं 84 लाखाचं कर्ज माफ झालं आहे. कर्जमुक्तीमुळं शेतकरी नव्या उमेदीनं शेतकामाला लागले आहेत.

 

– काशिनाथ वळवी, नंदुरबार